जूना गांव

         माझा जूना गांव म्हणजे माझ्या बालिश डोळ्यांनी पहिलेलं एक सुंदर स्वप्न. जिथे दूधसागराचा अखंड धबधबा कोसळत होता तरी एक जगावेगळी शांतता होती. जिथे रानपाखरांची सदैव किलबिल होती तरी गुंजणाऱ्या वाऱ्याच एक अजरामर संगीत ऐकू येत होतं. उन, वारा, पाऊस कितीही असो देव पहाडांच रूप घेऊन तिथल्या प्रत्येक निष्पाप जीवाच्या रक्षणासाठी सदैव निष्चलपणे उभे होते. ओबड धोबड मातीच्या सारवलेल्या अंगणातही रात्र चांदणं शिंपत येत होती. आणि हरवलेल्या प्रत्येक दिवसांच्या धुंद  आठवणी  त्याच रात्रीच्या अंधारलेल्या पोटात नाहिश्या होत होत्या.
      आज मन पुन्हा त्या हरवलेल्या दिवसाना साद घालते पण प्रतिसाद मात्र येत नहीं.  निळं पाणी निळं आभाळ, हिरवेगार डोंगर आणि लाल काळी माती. सुगीला गजबलेली हिरवी पिवळी शेती. आणि त्या पलीकडे सरस्वतीने आपला निळासावळा पदर टाकावा तशी लांबच लांब वाहत गेलेली नगमोडी नदी. जिच्यावर बारा महीने प्रत्येक जिव विसंबुन रहत होता.

     या नदीने आणि तिला मिळालेल्या ओहोळांनी इथल्या धरणीला खुप कही दिलेलं  होतं, आणि धरणी मातेच्या उदरातले ते दान वर्षानु वर्षे इथल्या प्रत्येकालाच मिळत होतं. कड़क उन्हाळा असला तरी इथे रानातल्या झाड़ा -झुडुपातला गारवा कायम टिकून असायचा. इथल्या धरणीच्या पोटातलं पाणी म्हणजे अमृताची धार होती. वॉटर फ़िल्टर सारख्या तकलादु यंत्राची कधीच गरज पडली नहीं. आणि इथला पाऊस !
... .. पहिल्या पावसात सारं रान नाहून प्रफुल्लित व्हायचं. वाऱ्याच्या लहरी बरोबर लपलपणाऱ्या हिरव्या गावतावरुन मातीचा नवा गंध दरवळत रहायचा. आणि आभाळभर तहानलेल्या पाखरांची किलबिल सुरु व्हायची. मग नक्षत्रा बरोबर हळुहळू पाऊस वाढत जायचा, जुन्या राईवळीने गजबजलेल्या पहाडांच्या कोंदणात निवलेल्या झ-याना पुन्हा पाझर फुटायचे. सोसाट्याच्या वाऱ्यात आंबा फणस आणि जाम्बळांची झड़ व्हायची.  साऱ्या गाववार भर दिवसा अंधराच झाकण टाकणारा पाऊस. कधी मोत्यांचा होऊन कुणब्यांची ओटी भरून वहात राहायचा. 

पाबळ
       धबधबा : याला आम्ही पाबळ म्हणत असे. हे पाबळाच राण म्हणजे जुन्या पुरान्या झाड़ा झुडपानी गजबजलेल दाट बन होतं. इथे दिवसाहि किर्र शांतता असायची. संध्याकाळी इथे एक -दोघेही एकटे जाण्याच कोणाच धौर्य होत नसे. थोडसं भयावह पण आजही तितकच ओढ लावणार हे राण. या पाबळा मुळे धबधब्याची एक अशीच कल्पना होऊन बसली. ती म्हणजे कोणताही धबधबा असेल तर तो असाच अगड़बम कोसळणारा पाण्याचा प्रपात असतो.  त्यानंतर कितीतरी ऊंच धबधबे पाहिले पण पाबळाची सर मात्र एकातही दिसली नाही.
मुसळधार पावसात या पाबळावरून गढूळ पाण्याचा मोठ्ठा प्रपात खालच्या खोल दरीत कोसळत , तेंव्हा त्याचा आवाज म्हणजे हजार वाघांची एकच गर्जना साऱ्या रानभर घुमत. आणि अंधारात बुडालेल्या गावावरुन त्याची ही गर्जना रात्रभर घोंगावत असे. 
पार  आणि मरुतीचे मंदिर 

ज्या मातीच्या कुशीत चिमूकल्या पावलांच बालपण हरवलं, ज्या झाडांच्या अंगाखांद्यांवरुन अल्लड वय निघून गेलं.  आणि आभाळात गेलेल्या  डोंगर वटांवरुन वेड्या साहसांचे खेळ खेळून झाले त्या साऱ्यानाच आज सांगावेसे वाटते ,
किस्मत से हम न थे जुड़े , जहा हवा फैलाती गई जीवन की नौका वहाँ चली आयी और बदनसीब है हम वही खड़े 

              

  

क्रमशः ......!

Blogger Widget

काव्यांजन

   //  प्रस्ताविक  //

  असच एका संध्याकाळी का कोणास ठाऊक  पण व्रतस्त झालेलं आभाळ काहीसं उदास झालं. आणि ध्यानस्त असलेल्या पहाडांच्या सावल्या अंधाराच्या अनामिक ओढीनं सरपटत येऊन माझ्या अवतरणात अलगद विलीन झाल्या.  मग मी माझं सावली नसलेलं अस्तित्व घेऊन हिंडू लागलो. काही वेळाने सांज सरीतून रक्तचिंब झालेलं लाल ओलं केशर झरझऱुण सांडू लागलं , मावळतीच्या गर्भ रेशिम दिशेला संधिप्रकाशची ओढ़ लागलेले पक्षी थव्या - थव्यानी  झेपावले.    आणि अंग हुळहुळनारा वारा मातीच्या उबदार कुशीत जीवघेण्या आनंदाने लोळू लागला.
  स्तब्ध रानात दूरवर एक सळसळ उठली आणि  वात भव-याच्या  मध्यबिंदुतुन उठलेलं रूद्र वावटळ धुळीचे
लोळ च्या लोळ त्या उदास निर्विकार आकाशावर त्वेषाने फेकू लागलं. व  मागू लागलं त्याच्या सवालीच आंदण   मग उशीरन दिशा -दिशा पांघरून घनगर्द काळोख आला. आणि गहिवरलेल्या अंतराळात एका हरवलेल्या एकट
दिवसाची धीरगंभीर विराणी घुमू लागली. तिच्या फाटक्या जड सुरांनी गजबजलेलं मन सैरभैर होऊन गर्द काळोखाचा अथांग डोह पिंजत राहिलं. किती तरी वेळ - किती तरी वेळ निघून गेला. आणि मग एका अदभूत कासायावेळी दिगंताच्या सुदूर वाटेवरून प्रकाश्याचे दूत त्या शब्दांची पालखी अनाहूतपणे घेऊन आले. तिच ही काव्यधारा म्हणजे सरस्वतीने दिलेली एक सुगंधीत फुलांची ओंजळ. तशी ती अजून अल्लड आहे. पण म्हणून मी काही तिच्यासाठी -हृदयाच्या पायघडया अंथरलेल्या नाहीत. कारण तिला देखिल या मातीची ओढ अगाध आहे. 

Blogger Widget